महात्मा फुले वाड्यात ‘वडाची पूजा’ हा त्यांच्या विचारांचा अपमान   

डॉ. बाबा आढाव यांची खंत

पुणे : महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या सामाजिक क्रांतीकारक दाम्पत्याने आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण अंधश्रद्धा, रुढी, परंपरा आणि विषमतेविरुद्ध लढ्यात घालवला. त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून विज्ञाननिष्ठ आणि समतेवर आधारित विचार समाजात रुजवले. गंजपेठेतील महात्मा फुले वाडा, जिथून हे क्रांतिकारी कार्य सुरु झाले, ते आज त्यांच्या कार्याची साक्ष देणारे स्मारक बनले आहे. येथेच सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली; मात्र अलीकडे या ऐतिहासिक स्मारकात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जात असून, त्यामुळे महात्मा फुले यांच्या विचारांचा सरळ अपमान होत असल्याची खंत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी केली आहे.
 
फुले दाम्पत्यांनी आयुष्यभर अंधश्रद्धेविरोधात लढा दिला, त्यांच्या स्मारकात पूजा करणे म्हणजे त्या कार्याला आणि मूल्यांना चिथावणी देणे आहे. ही कृती संविधानाच्या मूलभूत तत्त्वांना विरोध करणारी आहे, असे डॉ. आढाव यांनी स्पष्ट केले. महात्मा फुले स्मारकात असलेल्या वडाच्या झाडाजवळ महिला आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे म्हणून पूजा करत आहेत. ही पूजा स्त्री-पुरुष समानतेच्या मूल्यांना विरोध करणारी असून, अंधश्रद्धेला शरण जाणारी आहे. फुले दाम्पत्यांनी धर्माच्या नावावर स्त्रियांवर लादल्या गेलेल्या रुढींविरुद्ध लढा दिला, आज त्याच ठिकाणी त्या रुढींचा उत्सव साजरा होतोय, हे दुर्दैव असल्याचे डॉ. आढाव यांनी सांगितले.
 
स्त्री शिक्षणाची मूहूर्तमेढ सावित्रीबाईंनी रोवली, हेच संविधानाच्या मार्गाने महिलांना सांगायचे आहे. पुण्यात वैष्णवी हगवणेसारखे हुंडाबळीची प्रकरणे होतात, हे शोभनिय नाही. शासकीय कार्यालये, स्मारकात पुजापाठ करता येत नाही. 
 
फुले दाम्पत्यांनी स्त्री-पुरुष समानतेसाठी आणि समाजातील विषमतेसाठी अंधश्रद्धा, कर्मकांडाना तिलांजली देण्याचे आयुष्यभर कार्य केले. त्यांच्याच वाड्यात अलिकडच्या काळात असे कर्मकांड होतात. हे कर्मकांड होऊ नये यासाठी आज केलेल्या आंदोलनाचा पहिला टप्पा असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा जोशी यांनी सांगून यापुढेही स्त्रिया गुलामगिरीत राहू नये, याकरिता केले जाणार्‍या वटपौर्णिमा, हरतालिका या परंपरा बंद कशा याबाबत जनजागृती करणार आहोत. महिलांना प्रतिष्ठाचा मान मिळवून दिला आहे, त्या स्मारकात कर्मकांडाला स्थान असू नये म्हणून स्मारकात वडाची पूजा करु नये, म्हणून कुठलीही सक्ती न करता प्रबोधनाद्वारे भगिनींना विनंती करणार असल्याचे महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या सरचिटणीस शारदा वाडेकर यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी विविध सामाजिक संघटना संविधान प्रचारक शितल यशोधरा, राष्ट्रसेवा दलाच्या साधना शिंदे, बांधकाम मजूर संघटनेचे मोहन वाडेकर, गणेश मेरगू, कमल पायगुडे, अर्चना झेंडे, वामन वळवी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
महात्मा फुले स्मारक हे फक्त स्मरणाचे नव्हे, तर विचारांच्या जतनाचे स्थान आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अंधश्रद्धा पोसणार्‍या कृतींना तात्काळ थांबवले जावे, असे आवाहन डॉ. आढाव यांनी प्रशासनाबरोबरच समाजाकडेही केले आहे.
 

Related Articles